खान्देश! आभीर उर्फ अहिरांचा प्रदेश! सूर्यकन्या तापी , गिरणा , गोदावरीची सुपीक भूमी , चांगदेवादी संतांची भूमी , खान्देश कन्या बहिणाबाई , तर्कातीर्थ लक्ष्मण शास्त्रीची भूमी. मातृहृदयी साने गुरुजी , केशवसुत नवकाव्याचे जनक बा.सी.मर्ढेकरांची कर्मभूमी!
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव , धुळे , आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा (२३ तालुक्यांचा) प्रदेश आज खान्देश म्हणून ओळखला जातो. प्राचीनकाळी नाशिक हा प्रदेशही खान्देशातच गणला जाई. खान्देशचा आती प्राचीन , प्राचीन , मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशी संस्कृतिक परंपरा आहे. ‘ आभीर देश , अहिराष्ट्र , कान्हदेश , कानदेश , खानदेश ’ अशी या प्रदेशाची भली मोठी नामावली मिळते.
श्रीकृष्णाचे बालरूप अर्थात ‘ कान्हा ’ याचा तो ‘ कान्हदेश ’ आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असल्याचे मानले जाते. काहींच्या मते कानबाई हे खास खान्देशचेच दैवत असल्याने कानबाईचा तो कानदेश आणि त्याचाच अपभ्रंष ‘ खान्देश ’ असावा. आभीर या शब्दाचाच अपभ्रंश अहिर असून या प्रदेशाला अभिर प्रदेश ’ देखील संबोधले जाते.












